Thursday, 23 January 2025

नैवेद्य समर्पण आणि राजासाठीचे भोजन

 नैवेद्य समर्पण आणि राजासाठीचे भोजन

*अष्टांगहृदय सद्वृत्त : भाग 179*

 07 जून 2024, शुक्रवार 

*उपविभाग 123* 


सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट © लेखक : वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


*या उपक्रमात लिहिल्या जाणाऱ्या लेखांमध्ये असणारी विधाने ही आयुर्वेद सिद्धांत व संहिता ग्रंथ यावर आधारित शास्त्रीय सत्य तथ्य अशा स्वरूपाची प्रायः असतात. _परंतु या लेखांमध्ये काही विधाने काही रूढी परंपरा इतिहास याविषयीची माहिती सामाजिक माहिती मनोरंजन वैयक्तिक मत वैयक्तिक आकलन वैयक्तिक समजूत अशा स्वरूपाची सुद्धा असू शकतात_*


सिद्धैर्मन्त्रैर्हतविषं सिद्धमन्नं निवेदयेत् ।।


भोजनासाठी तयार केलेले अन्न हे सिद्धमंत्रांनी निर्विष करून खाण्यासाठी ताटात वाढून घ्यावे.


निवेदयेत् हे क्रियापद जरी संहितेमध्ये खाणारा साठी/ राजासाठी आलेले असले तरी,

निवेदयेत् या शब्दाने *नैवेद्य या विधीचे स्मरण होते*


आणि जनसामान्यांसाठी त्याच्या देवघरात असलेलं त्याचं आराध्य दैवत हाच राजा आहे, असे जाणून ... भोजनासाठी वाढून घेतलेले ताट हे देवाला निवेदन = नि वेदन करावे म्हणजे निश्चितपणे जाणवून द्यावे ... की हे भगवंता, तुझ्या इच्छेने तुझ्या कृपेने लाभलेले हे अन्न मी सेवन करणार आहे, तर ते तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने निर्विष = अर्थात् ते मला बाधाकारक न होता, आरोग्यकारक आणि आयुष्यवर्धक होवो, अशी प्रार्थना करावी ... 

प्रार्थना करताना नैवेद्य दाखवताना काही मंत्र म्हणावेत की जे सिद्ध आहेत !


सिद्ध याचा अर्थ जे निश्चितपणे यशस्वी आहेत, जे निश्चितपणे सुफल = चांगले फल देणारे आहेत. 


आणि सुदैवाने मराठी संस्कृतीमध्ये रामदास स्वामींनी प्रत्येक घरामध्ये म्हटले जाणारे (किमान मागल्या पिढीपर्यंत तरी) असे काही श्लोक हे सर्वांच्या श्रीमुखी रुळवलेले आहेत... 

ते म्हणजे *वदनी कवल घेता* ...


मंत्र किंवा सिद्ध मंत्र हे अन्न निर्विष करण्यास समर्थ असतात. ✅️


निर्विष याचा अर्थ प्रत्येक वेळेला अन्नात विष कालवलेले असते ...असा न घेता 

कोणतेही आरोग्य-हानीकारक/ शरीर बाधाकारक घटक किंवा परिणाम त्या अन्नामध्ये असू शकतील, तर त्याचे निवारण हे प्रार्थनेच्या / सिद्धमंत्रांच्या आणि स्वतःच्या शुभ संकल्पा द्वारे व्हावे, या अर्थाने *नैवेद्य हा विधी उपयोगी व हितकारक आहे*.


कोणते अन्नपदार्थ कोणत्या प्रकारच्या पात्रात भांड्यात वाढावेत? 


चला, काही माहीत नसलेल्या गोष्टी समजून घेऊया ...


साजूक तूप हे काळ्या लोखंडाच्या भांड्यात वाढावे.

(खरंतर अन्नपदार्थ काशाच्या भांड्यात सर्वोत्तम मानले जातात पण साजूक तूप आणि काशाचं भांड हे विरुद्धान्न आहे, 10 दिवसानंतर)


पेज, मांसाचा रस्सा soup, सर्व द्रव = पातळ पदार्थ /पिण्याजोगे पदार्थ हे चांदीच्या भांड्यात वाढावेत.

पेशवाई थाटात चांदीच्या ताटात ... अशी लोकप्रिय जाहिरात असली तरी, प्रत्यक्षात चांदीच्या भांड्यामध्ये पातळ पदार्थ वाढावेत.


फळे किंवा फळांच्या कापलेल्या फोडी आणि सर्व भक्ष्य म्हणजे दाताने तोडून खाण्याचे पदार्थ (जसे की लाडू चकली हे) पानावरती वाढावेत म्हणजे पत्रावळ किंवा केळीचे पान याच्यावरती.


पूर्णतः कोरडे पदार्थ (जसे की चिवडा) आणि चाटून खाण्याचे पदार्थ (जसे श्रीखंड), हे सोन्याच्या भांड्यात वाटी / बाऊलमध्ये वाढावेत. 🙂😇🙃


ताका सारखे आंबट पदार्थ आणि फळांचे रस हे दगडी पात्रामध्ये वाढावेत.


ऋतुमानानुसार थंडगार पाणी किंवा उकळून गार केलेले पाणी तांब्याच्या भांड्यात वाढावे.


पन्हे आणि मद्य यासारख्या आंबट बाबी मातीच्या भांड्यात वाढाव्यात. 


मद्य हे अन्न आहे ✅️ ... पण त्यामध्ये चे स्वरूप प्रमाण आणि वारंवारिता ही आरोग्य शास्त्राप्रमाणे असेल तरच!!! 


अन्यथा मद्यच काय ... तर प्रतिदिनी खाल्ले जाणारे सवयीचे अन्न सुद्धा विषच आहे, जर त्या अन्नाचे प्रमाण स्वरूप आणि वारंवारिता (फ्रिक्वेन्सी अँड क्वांटिटी) ही चुकीची असेल तर ...


कोणीही सर्वसामान्य माणूस दोन-तीन पोळ्या खातो, एक दीड वाटी भात खातो, एखादी वाटी आमटी वरण भाजी खातो ...

परंतु तेच जर 10-20 पोळ्या, पाच सहा वाटी भात, चार-पाच वाटी वरण आमटी भाजी खाल्ली ...

तर तेच अन्न हे त्याच्या प्रमाण किंवा फ्रिक्वेन्सी मुळे आरोग्यास हानिकारक ठरू शकते.


मद्य हे अन्न आहे ... पण त्यासाठी तिथले ऋतुमान आणि तिथला भौगोलिक प्रदेश हा मद्य सेवनासाठी आरोग्य शास्त्रदृष्ट्या अनुकूल असायला हवा ... तरच हे विधान योग्य आहे.


अन्यथा... *मद्यम् न पेयम्* हेच सत्य आहे!!!


याव्यतिरिक्त इतर सर्व विविध प्रकारचे अन्नपदार्थ काचेच्या स्फटिकाच्या रत्नांच्या पासून बनवलेल्या पात्रात वाढावेत.


आजकालचे व्यवहार पाहता ...

कुठलीही चवीच्या अन्नपदार्थाचा परिणाम पात्राच्या/भांड्याच्या घटकावर (मटेरिअलवर) होणार नाही किंवा पात्राच्या घटकाचा दुष्परिणाम अन्नपदार्थावर होणार नाही, या दृष्टीने निष्क्रिय किंवा इनर्ट अशा प्रकारच्या पात्रांमध्ये अन्न वाढणे, हे आरोग्यास हितकारक असते.


म्हणून आज एसएस स्टेनलेस स्टील किंवा चिनीमातीची भांडी क्रोकरी काचेचा डिनर सेट असे ज्याला म्हणतात, त्यात अन्नपदार्थ वाढणे, हे सर्वात चांगले!!!


किंबहुना, धातूच्या भांड्यात अन्न शिजवून तयार झाल्यानंतर, ते वाढण्यापूर्वी साठवण्यासाठी व जेवण झाल्यानंतर शिल्लक राहिलेले अन्न ठेवण्यासाठी म्हणून सुद्धा, काचेच्या / चिनी मातीच्या भांड्यांचा वापर करणे, हे योग्य आहे.

कारण त्या भांड्यांचा अन्नावर किंवा अन्नाचा त्या भांड्यांवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम /रासायनिक प्रक्रिया /केमिकल रिॲक्शन संभवत नाही.


*परंतु आजकाल जे डिस्पोजेबल कंटेनर वापरले जातात, जे प्रायः पारदर्शक अर्ध पारदर्शक किंवा अपारदर्शक अशा पांढऱ्या किंवा काळ्या रंगाच्या प्लास्टिकचे असतात ... ते मात्र निश्चितपणे निषिद्ध वर्ज्य त्याज्य आहे*


मागील पिढीपर्यंत पंक्तीचे/पंगतीचे किंवा निमंत्रित भोजनाचे, यजमानाचे, जेवायला बोलावलेले मेहूण जेवायला बसताना ...

त्यांचे ताट वाढण्याची एक विशिष्ट पद्धत, क्रम आणि स्थाननिवेश हा ठरलेला होता... तो पाळला जायचा!!! 


आता मात्र कुठेही काहीही वाढले जाते / किंवा बुफे मध्ये स्वतःच वाढून घेतले जाते आणि ते कशानेही खाल्ले जाते. असो.


कोठे काय वाढावे ?

याचे संहितेतील मार्गदर्शन पाहूया 


ताट हे पुरेसे विस्तीर्ण मोठे असावे.


त्यामध्ये जे मुख्य अन्न आहे ते म्हणजे वरण-भात/ पोळी चपाती भाकरी हे अगदी समोर/जवळ ... 

म्हणजे गोल ताट हे घड्याळ आहे, असे समजले तर ... सहा वाजता मुख्य अन्नपदार्थ वाढलेले असावेत. 🕕


फळे, दाताने चावून खाण्याचे तोडून खाण्याचे पदार्थ आणि कोरडे पदार्थ हे उजव्या बाजूला म्हणजे घड्याळाच्या नुसार एक ते पाच या भागात वाढलेले असतात 🕐🕔


पाणी दूध इत्यादी सर्व प्रकारचे पातळ द्रव पदार्थ हे डाव्या बाजूला म्हणजे साधारणतः सात ते अकरा या भागात वाढलेले असावे 🕖🕚


मुख्य अन्नपदार्थांच्या वरती साधारण ताटाच्या मधोमध ते बारा वाजता 🕛एवढ्या भागामध्ये ... इतर सर्व पदार्थ वाढावेत.


ताटातील अन्नपदार्थांच्या स्थाना विषयी सांगताना, घड्याळातील अंकांचा संकेत वरती सांगितला.


म्हणून या प्रसंगानुसार, जाता जाता ... 

हेही सांगणे उपयोगी होईल की ...

अंध व्यक्ती आपल्या सोबत जेवायला असेल तर,

त्या व्यक्तीला अन्नपदार्थ कुठे आहे, हे सांगताना पुढे मागे उजवीकडे डावीकडे खाली वर असे *आपल्या संदर्भात न सांगता* ...

जेवणाऱ्या अंध व्यक्तीच्या संदर्भाने ...

ताटामध्ये *"घड्याळाच्या अंका नुसार"* कोणता पदार्थ कोठे आहे, 🕐🕔🕚🕕🕖🕛 हे सांगावे ...

ते त्यांना अतिशय सोपे होते ✅️ 🫱🏻‍🫲🏽


*देहवाक्चेतसां चेष्टाः प्राक् श्रमाद्विनिवर्तयेत्।* 

आणि

*न पीडयेत् इंद्रियाणि*

हे दोन्ही श्लोक आपण एकत्र पहात आहोत.


_(डिस्क्लेमर : या उपक्रमात व्यक्त होणारी मतं, ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असे लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही. हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे, याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे, ही संभावना मान्य व स्वीकार करूनच, हे लेख लिहिले जात आहेत.)_


त्वदीय वस्तु गोविंद 

तुभ्यम् एव समर्पये ।


तेरा तुझको अर्पण

क्या लागे मेरा ।


श्रीकृष्णाsर्पणम् अस्तु।


🙏🏼

सर्वाधिकार सुरक्षित all rights reserved

Copyright कॉपीराइट ©वैद्य हृषीकेश बाळकृष्ण म्हेत्रे. 

एम् डी आयुर्वेद, एम् ए संस्कृत.

आयुर्वेद क्लिनिक्स @पुणे & नाशिक.

9422016871

MhetreAyurved@gmail.com 

www.MhetreAyurveda.com www.YouTube.com/MhetreAyurved/


No comments:

Post a Comment